गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.८: आदिवासीबहुल व विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेली गडचिरोली नगर परिषद नेहमीच राज्यकर्त्यांना आकर्षित करीत असते. या नगर परिषदेतील सत्तेच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात राजकारणाला समाजकारणाची जोड देत 'गराध्यक्ष कसा असावा', या नागरिकांच्या अपेक्षेवर खरे उतरत अल्पावधीतच समाजमन जिंकून घेत जनतेचा नगराध्यक्ष म्हणून योगिताताईंनी नावलौकिक मिळविला.
प्रमोद पिपरे यांच्या अर्धांगिणी असलेल्या योगिताताईंचे संभाषण चातुर्य, समाजाला सोबत घेऊन चालण्याची वृत्ती व प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची तयारी या गुणांमुळे नागरिकांनी त्यांना शहराचा प्रथम नागरिक बनण्याची संधी बहाल केली. विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या गडचिरोलीला 'स्मार्ट सिटी' बनविण्याचा ध्यास बाळगत योगिताताईंच्या नेतृत्वात दीड वर्षांच्या कार्यकाळात शहरात विविध विकासकामांचे सत्र सुरु झाले. केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे प्रयत्न योगिताताईंनी सुरु केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांतूनच शहरातील ९२.१० कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. भूमिगत गटारांबरोबरच येत्या काही दिवसांतच ३ कोटी रुपये खर्चून आठवडी बाजाराचे रुपही पालटलेले आपणास दिसणार आहे. नागरिकांना चोवीस तास मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस योगिताताई व्यक्त करतात. यासाठी मीटरद्वारे नळाचे पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाय सुभाष वॉर्डातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून २.६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, विसापूरसाठी २.१६ कोटी, तर शहरातील पाईपलाईनसाठी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहराचे सौंदर्यीकरण हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. म्हणूनच ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी ४.७८ कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत वृक्ष लागवड व इतर कामांसाठी ५० लाख, ८ रस्त्यांच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ कोटी ७८ लाख, दलित वस्ती सुधारण्यासाठी ५४ लाख, नगरोत्थानासाठी २ कोटी, विशेष रस्ता अनुदान १६ लाख, रस्ता अनुदान ६० लाख, जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जातीच्या उपयोजनेसाठी ३० लाख, स्वच्छ भारत अभियानांतर्गत ८९ लाख असे १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. प्रत्येक घरमालकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याचे उद्दिष्ट असून, याविषयीचे सर्वेक्षण पूर्ण होताच प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. नगर परिषदेच्या १० शाळा डिजीटल करण्यात आल्या असून, या शाळांतील विद्यार्थ्यांना आरओचे पाणी पुरविले जाणार आहे.
शहरात नगर परिषद प्रशासन भवन, नाट्यगृह, बगिचा, जलतरण तलाव व आवश्यक तेथे मुलभूत सोयीसुविधा निर्मितीसाठी योगिताताई कटिबद्ध आहेत. केवळ दीड वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्या बाबतीत गरुडझेप घेताना योगिताताईंनी समाजमनावर आपली वेगळी छाप सोडली आहे.