गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.४:जनतेने प्रचंड प्रेम दिल्यानेच आपण राजकारणात यशस्वी झालो. जनतेचा विश्वास व पाठिंब्यामुळेच आपले सामाजिक कार्य अविश्रांतपणे सुरु राहील, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले.
भाजप व मित्र परिवाराच्या वतीने खा.अशोक नेते यांचा सुप्रभात मंगल कार्यालयात सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, रा.स्व.संघाचे प्रचारक भाईजी मेहरा, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, भाजप नेते बाबूराव कोहळे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, सुधाकर येनगंधलवार, प्रशांत वाघरे, प्रशांत भृगुवार, अविनाश महाजन, अनिल पोहनकर, नगर परिषदेचे बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक भूपेश कुळमेथे, डॉ.शिवनाथ कुंभारे उपस्थित होते.
खा.अशोक नेते पुढे म्हणाले, रेल्वे, वनजमिनीचे पट्टे व सिंचन हे तीन प्रश्न आपल्या अजेंड्यावर होते. आज तिन्ही प्रश्न मार्गी लागले आहेत. यापुढेही आपण लोकांच्या सहकार्याने जिल्ह्याचा विकास करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवू,असेही ते म्हणाले. आ.डॉ.देवराव होळी म्हणाले की, भाजपच्या सत्तेच्या काळात जिल्ह्याचा विकास होत आहे. अनेक प्रश्न सुटले असून, काही समस्या सुटण्याच्या मार्गावर आहेत. याचे श्रेय खा.अशोक नेते यांनाच जाते. जिल्ह्यातील सर्व आमदार व कार्यकर्ते खा.अशोक नेते यांच्या पाठीशी आहेत, असेही डॉ.होळी यांनी सांगितले. या कार्यक्रमापूर्वी आरोग्य तपासणी, मोतीबिंदू तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो नागरिकांनी त्याच लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाघरे, संचालन रवींद्र ओल्लालवार, तर आभार प्रदर्शन डॉ.भारत खटी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्याम वाढई, रवी भांडेकर, दिनेश नंदनवार आदींनी सहकार्य केले.