गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२: शासकीय योजनेतून मिळालेल्या विहीर बांधकामाचे देयक मंजूर करण्याकरिता लाभार्थी शेतकऱ्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज देसाईगंज येथील जिल्हा परिषद सिंचन उपविभागातील शाखा अभियंता हरी आत्माराम गोन्नाडे(५६) यास रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा शेतकरी असून, त्याला 'मागेल त्याला विहीर' या योजनेतून विहीर मंजूर झाली होती. त्यानुसार त्याने आपल्या शेतात विहिरीचे बांधकाम केले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतिम देयक मंजुरीकरिता तक्रारकर्त्याने शाखा अभियंता हरी गोन्नाडे याची भेट घेतली. परंतु गोन्नाडे याने अंतिम देयक प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याकरिता तक्रारकर्त्याला ८ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला असता, शाखा अभियंता हरी गोन्नाडे यास तक्रारकर्त्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यामुळे एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(ड)अन्वये देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, महेश कुकुडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली
विहीर योजना बनली अभियंत्यांसाठी कुरण
'मागेल त्याला विहीर' योजना ही सिंचन विभागाच्या काही अभियंत्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. प्रामाणिकपणे विहिरीचे बांधकाम करुनही काही अभियंते लाभार्थीला पैसे घेतल्याशिवाय देयकाची रक्कम अदा करीत नाही. देवाणघेवाणीतूनच बरीच कामे केली जातात. परिणामी सिंचनाचे पाणी कुठे मुरते, हे कळत नाही. मागच्या वर्षी २७ जून २०१७ रोजी गडचिरोली येथील सिंचन उपविभागातील शाखा अभियंता सुरेश बोकाडे यास विहिरीच्या लाभार्थीकडूनच लाच स्वीकारताना एसीबीने पकडले होते. आता हरी गोन्नाडे या अभियंत्याचा नंबर लागला.