गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१: आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील जिमलगट्टानजीकच्या गोविंदगाव येथे काळी-पिवळी टॅक्सी व बलेनो वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ७ जण ठार, तर ४ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
कमल मारोती मित्तलवार(३५), मारोती केशवराव मित्तलवार(६०),लता मारोती मित्तलवार(५५), श्रीनिता कमल मित्तलवार(५ महिने),सरस संदीप मित्तलवार(दीड वर्ष)सर्व रा. चंद्रपूर, निखिल देवराव मोहुर्ले(२८) रा.मुरखळा, ता.गडचिरोली व संदीप आनंदराव गडप(४०) अशी मृतांची नावे आहेत. सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर आक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले व देवराव सखाराव मोहुर्ले हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, देवराव मोहुर्ले हे देवराव मोहुर्ले हे एमएच ३४-०७९१ क्रमांकाच्या काळी-पिवळी टॅक्सीने सिरोंचा येथून घरगुती सामान घेऊन आलापल्लीच्या दिशेने येत होते, तर चंद्रपूरचे मित्तलवार कुटुंबीय एमएच ३४-बीएफ ४८६१ क्रमांकाच्या बलेनो गाडीने सिरोंचाकडे जात होते. गोविंदगावजवळ या दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यात बलेनो वाहनातील ४ जण जागीच ठार झाले. जखमींना जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. परंतु तेथे काळी-पिवळी टॅक्सीचा चालक व बलेनो वाहनातील दोन बालकांनी प्राण सोडला. बलेनो वाहन चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प येथील असून, त्यात एकाच कुटुंबातील पाच महिन्यांची बालिका, एक दीड वर्षीय बालक, त्यांची आई, वडील व आजी आणि आजोबा असे सर्व जण ठार झाले. ते कालेश्वर येथे दर्शनासाठी जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.