गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३०: सुरजागड येथील पहाडावरुन लोहखनिज उत्खननाची लीज मिळालेली जागा तत्काळ उपलब्ध करुन द्या, असे निर्देश पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी जिल्हा प्रशासन व वनविभागाला दिले.
सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खनन करण्यासाठी जमिनीची लीज मिळाल्यानंतरही वनविभागाने लाल झेंडी पुढे केल्याने लॉयड मेटल्स अॅंड एनर्जी लिमिटेड या कंपनीचा लोहखनिज प्रकल्प अडचणीत सापडल्याचे वृत्त 'गडचिरोली वार्ता'ने प्रकाशित केल्यानंतर काल(ता.२९)राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत श्री.आत्राम यांनी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
शासनाने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला सुरजागड पहाडावरील ३४८ हेक्टर जमीन लोहखनिज उत्खननासाठी लीजवर दिली. प्रत्यक्षात मात्र कंपनीच्या ताब्यात पहिल्या टप्प्यात ४ हेक्टर व दुसऱ्या टप्प्यात १० हेक्टर अशी केवळ १४ हेक्टर जमीनच देण्यात आली आहे. आणखी १० हेक्टर जमीन ताब्यात द्यावी, यासाठी कंपनीने शासनाकडे वर्षभरापासून पाठपुरावा केला. परंतु भामरागड उपवनसरंक्षक कार्यालयाकडून विविध कारणे सांगून जमीन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी पहाडावरील लोहखनिज उत्खनन थांबले आहे. यासंदर्भात कालच्या बैठकीत पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी तत्काळ लीजची जागा उपलब्ध करुन देण्याचे, तसेच पहाडावर विद्युत व्यवस्था व पोलिस चौकी निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता लॉयड मेटल्स कंपनीला उर्वरित जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीला आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रादेशिक मुख्य वनसरंक्षक श्री.एटबॉन, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, पोलिस उपअधीक्षक(गृह) पी.व्ही.चौगावकर, खनिकर्म अधिकारी श्री.भोंड उपस्थित होते.
मार्कंडादेव मंदिराचा जीर्णोद्धार करा
भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मार्कंडादेव मंदिराच्या जीर्णेाध्दार कामास गती द्यावी. सोबतच पुर्ण गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी बैठकीत दिले.
मंदिर जीर्णोध्दार करण्याच्या कामाला ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरुवात झाली आहे. ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे संरक्षित घोषित करण्यात आली असल्याने याचे जीर्णोध्दाराचे काम त्यांना देण्यात आले आहे. काम बऱ्यापैकी किचकट आहे याची जाणीव आहे. तरीदेखील याबाबत निश्चित योजना व कालबध्द काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.