गडचिरोली | --°C | --°C |
नागपूर, ता.१४: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद क्षेत्रातून भाजपतर्फे रिंगणात असलेले डॉ.रामदास आंबटकर यांच्या विजयासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे, तसेच लोकप्रतिनिधींनी कुठलीही अपेक्षा न ठेवता डॉ.आंबटकर यांना निवडून द्यावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल(ता.१३)नागपुरातील हॉटेल सेंटर पाँइंट येथे भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते, खा.रामदास तडस, आ.नाना शामकुळे, भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, डॉ.रामदास आंबटकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी यांनी पूर्वीच्या काही स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना खडसावले. विधान परिषद निवडणुकीत पक्षविरोध चालणार नाही, असा दमही त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हा विकास करणारा पक्ष असून, सर्व क्षेत्रांचा विकास करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपकडे मतदारांचे पुरेसे संख्याबळ असल्याने डॉ.आंबटकर यांचा विजय व्हायलाच हवा, असे ते म्हणाले.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुठलीही गाऱ्हाणी ऐकवू नये, असेही गडकरी आणि फडणविसांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची कुजबूज पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे.