मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेऊ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 15th April 2018 06:12:39 AM

गडचिरोली, ता.१५: मागील साडेतीन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने भरपूर निधी दिला. यापुढेही आणखी महत्त्वाचे निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या इमारतीचे उद्घाटन श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालु दंडवते, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त श्री.अनुपकुमार, पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त झाला, ही चांगली गोष्ट आहे. एखादा जिल्हा जेव्हा हागणदारीमुक्त होतो तेव्हा मनुष्याच्या आरोग्यात सुधारणा होत असते. त्याअनुषंगाने जिल्ह्यात घरोघरी शौचालये बनविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हा जिल्हा येत्या २ वर्षांत बेघरमुक्त होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील. पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक गरजूला घर मिळेल. जंगलातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृ्‌ष्टीने मोठे प्रयत्न सुरु आहेत. गोरगरिबांना मोफत शस्त्रक्रिया करता येतील, अशी योजना शासनाने सुरु केली आहे.

नवीन महिला व बाल रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे एकही माता व बालकाचा मृत्यु होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आकांक्षित जिल्हा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड केली आहे. त्यासाठी शासनाने ४० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास भत्ता देण्याविषयी शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, समितीच्या शिफारसींच्या आधारावर त्रास भत्त्याच्या लाभ दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले, बाल मृत्यु, माता मृत्यु व अर्भक मृत्यु ही आव्हाने असून, ती कमी करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. प्रसूती दवाखान्यात झाली पाहिजे, यासाठी भरीव प्रयत्न होणे गरजेचे आहे. यापूर्वी जिल्ह्यातील मेंदूज्वराचे प्रमाण कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा वर्कर्स चांगले काम करीत असल्याचे सांगून डॉ.सावंत यांनी जिल्ह्यात शव वाहून नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
01UWX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना