गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

विद्यापीठातील मंडळींनी मर्यादित न राहता समाजाभिमुख व्हावं-नितीन गडकरी

Saturday, 31st March 2018 04:13:53 AM

गडचिरोली, ता.३१: गरिबी व बेरोजगारी हे देशापुढील दोन मोठे प्रश्न आहेत. अलिकडे विद्यापीठांमधून पदवी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु पदवी आणि रोजगाराचा संबंध नाही. त्यामुळे विद्यापीठातील उच्चशिक्षित मंडळींनी स्वत:ला मर्यादित न ठेवता समाजाभिमुख व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या ५ वा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या समारंभात  मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.निशिकांत मायी, प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले व विविध विभागांचे अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, विद्यापीठाच्या मंडळींकडे विकासाचे व्हीजन असले पाहिजे. त्यासाठी अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करावी. आता शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ८० वरुन ६५ टक्क्यांवर आली आहे. युवा वर्ग शहरात जात आहे आणि ती एक समस्या बनली आहे. त्यामुळे गावातच युवकांना रोजगार कसे देता येईल, याचा विचार व्हावा. विद्यापीठाने जुने अभ्यासक्रम न शिकविता रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकविले पाहिजे. ज्ञानाचा उपयोग संपत्ती निर्माण करण्यास झाला पाहिजे, असे श्री.गडकरी म्हणाले. केवळ पैसा मागून काहीही होणार नाही, तर शिक्षणाचं ऑडिट झालं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देशात ११५ जिल्हे मागास असून, त्यात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. या जिल्ह्यांच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या योजनेतून भरीव काम करण्यात येत आहे. या भागात आपण साडेबारा हजार कोटींचे रस्ते मंजूर केले असून, त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नदींवरील पुलांचे काम पूर्ण झाल्यास विकासास मदत होईल. वीज, इंटरनेट या सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री.गडकरी यांनी केले.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यापीठ स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचा उहापोह केला. विद्यापीठाने कागदी व पारंपरिक न राहता जपानच्या इकिगाई या सकंल्पनेचा वापर करुन नावीन्यपूर्ण काम व संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले. विद्यापीठासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

डॉ.नामदेव कल्याणकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

यावेळी हिवाळी २०१६ व उन्हाळी २०१७ च्या परिक्षेतील १५५९९ विद्यार्थ्यांना पदव्या, तसेच २८७ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांपैकी प्रथम असणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व २९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने, तर २१ विद्यार्थ्यांना २८ सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर व प्रा.शिल्पा आठवले यांनी केले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RV1H1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना