गडचिरोली | --°C | --°C |
लीलाधर कसारे/हेमलकसा, ता.३०: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील तालुका म्हणून भामरागड तालुक्याची ओळख आहे. येथे नक्षल्यांशी लढणाऱ्या पोलिसांचे कौतुक करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देण्यावाचून राहवले नाही. ते आले आणि येथील चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये बराच वेळपर्यंत रममाण झाले...
भामरागड तालुका नक्षलग्रस्त आहे, हे सर्वश्रुत आहे. आदिवासीबहुल हा तालुका दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. कधी आदिवासींवरील अत्याचार, तर कधी नक्षल्यांच्या कारवाया हे चर्चेचे कारण असते. याच तालुका मुख्यालयी काल(ता.२९)देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर केंद्रीय राखीव दलातर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले होते. आल्याआल्याच त्यांनी पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समिक्षा आमटे यांच्याशी श्री.अहीर यांनी सविस्तर चर्चा केली. डॉ. प्रकाश आमटे यांनी हंसराज अहीर व खा. अशोक नेते यांना लोकबिरादरी प्रकल्पातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्राणी अनाथालय, सौर ऊर्जा वापर प्रकल्प, आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे संगणक कक्ष, सुसज्ज वसतिग्रुह, लोकबिरादरी आश्रमशाळेंतर्गत विद्यार्थ्यांसाठीचे विविध उपक्रम, गोटुल, आश्रमशाळा, लोकबिरादरी हॉस्पिटल आदींची हंसराज अहीर यांनी पाहणी केली.
देशाच्या गृहराज्यमंत्र्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवत त्यांच्याशी संवाद साधला. बराच वेळपर्यंत ते विद्यार्थ्यांमध्ये रममाण झाले. एकेकाळी शिक्षणाचा गंध नसलेल्या या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य डॉ. प्रकाश आमटे यांच्या सेवाकार्यामुळे सुगंधित झाल्याचे समाधान देशाच्या गृहराज्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
" श्रद्धेय बाबा आमटे यांची समाजसेवेची प्रेरणा घेत डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी भामरागडच्या निबीड अरण्यात ४६ वर्षांपूर्वी लोकबिरादरी प्रकल्पाद्वारे समाजसेवेची बिजे रोवली; त्याचा विस्तार आता बराच झाला आहे. डॉ. प्रकाश आमटे यांची दोन्ही मुले डॉ. दिगंत व अनिकेत तसेच दोन्ही स्नुषा डॉ. अनघा व समिक्षा यांनीसुद्धा समाजसेवेचा हा वसा पुढे चालू ठेवला आहे. प्राणी अनाथालयातील विविध प्राण्यांची सुश्रुषा, आदिवासी मुलां-मुलींकरिता संगणक कक्ष, सुसज्ज वसतिग्रुह, वाचनालय, आश्रमशाळेतील विविध उपक्रम, जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर आणि सर्वांसाठी असलेली उत्तम आरोग्य सेवा पाहून मी भारावून गेलो.", असे गौरवोद्गार हंसराज अहीर यांनी काढले.