गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२२ : राज्य शासनाच्या 'रंग दे महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत राज्यातील ३५० शाळा, अंगणवाड्या व ग्रामपंचायतीची रंगरंरोटी करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व मुलचेरा तालुक्यातील ११ शाळा व ७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे रुप बदलण्यास मदत होणार आहे.
सामाजिक समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे व सामाजिक विकासाच्या पातळीवर काम करण्यासाठी नागरिकाना सहभागी करून घेण्याच्या मोहिमेंतर्गत एमव्हीएसटीएफ संघटनेने आंतराष्ट्रीय रंग दिनाचे औचित्य साधून 'रंग दे महाराष्ट्र' मोहिमेचे आयोजन केले आहे. कन्साई नेरोलॅक आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
रंग दे महाराष्ट्र उपक्रम राज्यातील ३५० शाळा, अंगणवाड्या व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात गडचिरोली, चंद्रपूरसह राज्यातील ११ जिल्ह्यांतील १२० ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. समाज विकास आणि ग्रामीण विकासातील सुत्रबध्दता साधणे, हे या उपक्रमाचे ध्येय आहे.
शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि पोषण आहार, लिंग समानता या प्रमुख सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीच्या भिंतीवर सामाजिक संदेशाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीच्या इमारती केवळ रंगीत होणार नाहीत, तर नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होईल आणि अधिक चांगली शिक्षण व्यवस्था जन्माला येईल, गावाबद्दलची मालकी भावना नागरिकांमध्ये निर्माण होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'रंगे दे महाराष्ट्र' उपक्रमाबाबत व्यक्त केला आहे.