गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१०: जनकल्याण समाजोन्नती अन्या, भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असून, हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी समितीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आयेशा अली यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
आयेशा अली यांनी सांगितले की, जनकल्याण समाजोन्नती अन्या, भ्रष्टाचार निवारण समिती समाजातील अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न करीत असते. घटनेच्या दिवशी समितीचे पदाधिकारी विवेक बारसिंगे, कुणाल पेंदोरकर, पंकज बारसिंगे, आरिफ कनोजे व मदन मडावी हे चामोर्शी येथे समितीच्या बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून पदाधिकारी गडचिरोलीकडे परत येत असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी लिलाव न झालेल्या रेती घाटावरुन रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे सर्वजण रेतीघाटावर पोहचले असता तेथे रेतीची अवैध वाहतूक होताना दिसले. पदाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून तहसीलदारांना माहिती दिली. काही वेळाने आलेल्या नायब तहसीलदारांनी कोणतीही कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून दिला. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक श्री.थोरात यांनी बोलावल्यानंतर सर्वजण पोलिस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी रेती वाहतूकदार व दारु विक्रेत्याला बोलावून त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि समितीच्या पाचही पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदविले, असा आरोप आयेशा अली यांनी केला. पोलिसांनी अवैध दारुविक्रेता व रेती तस्कराला हाताशी धरुन आमच्या समाजसेवी संघटनेचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आयेशा अली यांनी केला. शिवाय संबंधित दारु विक्रेता व रेती तस्कराची चौकशी करुन आमच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही अली यांनी केली.
पत्रकार परिषदेला जनकल्याण समाजोन्नती अन्या, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद देविकार, जिल्हा सचिव कमलेश खोब्रागडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष ज्योती बागडे, सचिव प्रेमिला कतलामी, महासचिव पुष्पा करकाडे तसेच आरिफ कनोजे उपस्थित होते.