गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१९: देश व राज्यातील भाजप सरकार जातीयवादी आणि ओबीसीविरोधी असून, या सरकारच्या धोरणाविरोधांत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यव्यापी जनजागृती अभियान राबवीत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
ईश्वर बाळबुद्धे यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसींसाठी मोठे योगदान आहे. परंतु ओबीसींना अजूनही बाबासाहेब समजलेले नाहीत. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या कलमान्वये मंडल आयोगाची स्थापना झाली आणि व्ही.पी.सिंग यांनी या आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. परंतु भाजपने मंडल आयोगाला विरोध म्हणून त्यावेळी रथयात्रा काढली होती. व्ही.पी.सिंग यांच्याप्रमाणेच शरद पवारांनी ओबीसींच्या हितासाठी मोठे प्रयत्न केले. सत्तेत असताना त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ५०० कोटींची तरतूद केली होती. पूर्वी हा निधी केंद्रातून राज्याला मिळायचा.परंतु ३ वर्षांपासून या निधीत कपात करण्यात आली. आधी ५०० कोटींचा निधी ७२ कोटींवर आणि आता तो केवळ ५४ कोटींवर आणण्यात आला. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ओबीसी विद्यार्थी शिकूच नये, असा सरकारचा डाव असल्याची टीका श्री.बाळबुद्धे यांनी केली. देशाच्या सीमेचे रक्षण ओबीसी व बहुजन करतात. मात्र, पुरस्कार भलत्यांनाच मिळतात. बहुतांश शेतकरी बहुजन समाजातील आहेत. परंतु त्यांच्यावरही अन्याय करण्याचे काम सरकार करीत आहे. एकूणच ओबीसींना संपविण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप श्री.बाळबुद्धे यांनी केला.
सरकारच्या या धोरणाविरोधात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, १४ एप्रिलला बारामतीत या अभियानाचा समारोप होईल, अशी माहिती श्री.बाळबुद्धे यांनी दिली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक वामनराव झाडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, ज्येष्ठ नेते प्रकाश ताकसांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, सुलोचना मडावी, जिल्हा सरचिटणीस जगन जांभूळकर, जिल्हा उपाध्यक्ष फहीमभाई काझी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, संजय कोचे, हबीबभाई, बरकत सय्यद, विवेक ब्राम्हणवाडे, विवेक सहारे, कबिर शेख, जुगनसिंह पटवा, मनिषा खेवले, मनिषा सजनपवार उपस्थित होते.