गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दोन वर्षांत एक टक्क्याने वाढले देशातील वनक्षेत्र

Wednesday, 14th February 2018 07:40:51 AM

गडचिरोली,ता.१४:भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात २०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या काळात ८,०२१ चौरस किलोमीटरने म्हणजेच एक टक्का वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. भारताचा वनअहवाल-२०१७ सोमवारी(ता.१२) पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी प्रकाशित केला. 

भारताचे एकूण वनक्षेत्र ७ लाख ८ हजार २७३ चौरस किलोमीटर असून, ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के आहे. वृक्ष आणि वनक्षेत्र मिळून ८ लाख २,०८८ चौरस किलोमीटर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.३९ टक्के आहे. २०१५ च्या तुलनेत भारताच्या घनदाट जंगलात १.३६ टक्क्याने वाढ झाली आहे. जंगल क्षेत्रातील वाढ ६,७७८ चौरस किलोमीटर असून वृक्षाच्छादन १ हजार २४३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. सद्य:स्थितीत भारतातील घनदाट जंगल ९८ हजार १५८ चौरस किलोमीटर असून, मध्यम घनदाट जंगलाचा भाग ३ लाख ८ हजार ३१८ चौरस किलोमीटर एवढा आहे. खुले वनक्षेत्र हे ३ लाख १ हजार ७९७ चौरस किलोमीटर आहे.

२०१५ व २०१७ या दोन अहवालांचा अभ्यास केल्यास मागील दोन वर्षांत भारतातील वनक्षेत्रात ६७७८ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ या तीन राज्यांनी मोठे योगदान दिले असून, त्या राज्यांमध्ये अनुक्रमे २१४१ चौरस किलोमीटर, ११०१ व १०४३ चौरस किलोमीटरचे जंगल क्षेत्र वाढले आहे. जंगल क्षेत्रांतर्गत व त्याबाहेर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन व संवर्धन, तसेच उपग्रहाच्या माहितीचा अभ्यास करुन केलेले नियोजन यामुळेच हे शक्य झाल्याचा अभिप्राय अहवालात नोंदविण्यात आला आहे. 

उपरोक्त तीन राज्यांखालोखाल अन्य राज्यांनीही वनक्षेत्र वाढविण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. त्यात ओडिशा(८८५ चौरस किलोमीटर), आसाम(५६७चौरस किलोमीटर),तेलंगणा(५६५ चौरस किलोमीटर),राजस्थान(४६६ चौरस किलोमीटर),हिमाचल प्रदेश(३९३ चौरस किलोमीटर),उत्तरप्रदेश (२७८ चौरस किलोमीटर), जम्मू आणि काश्मिर(२५३ चौरस किलोमीटर),मणिपूर(२६३ चौरस किलोमीटर) यांचा समावेश आहे. दुसरीकडे मिझोराम(५३१ चौरस किलोमीटर), नागालँड(४५०) व अरुणाचलप्रदेश(१९०) या प्रदेशांमध्ये वनक्षेत्रात घट झाली झाल्याची नोंद अहवालात घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशपातळीवर घनदाट जंगलाचे क्षेत्र ९५२६ चौरस किलोमीटर, तर खुल्या जंगलाचे क्षेत्र १६७४ चौरस किलोमीटरने वाढले आहे. मात्र, मध्यम घनदाट जंगलाच्या क्षेत्रात ४४२१ चौरस किलोमीटरची घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्रात ५० हजार ६८२ चौरस किलोमीटर वनक्षेत्र

उपग्रहाच्या माहितीच्या आधारे ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत केलेल्या गोळा केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५० हजार ६८२ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १६.४७ टक्के एवढे आहे. राज्यात ८.७३६ चौरस किलोमीटरचे घनदाट जंगल, २०६५२ चौरस किलोमीटर मध्यम घनदाट जंगल, तर २१२९४ चौरस किलोमीटरचे खुले जंगल आहे.

महाराष्ट्रात वनक्षेत्र घटले

एकीकडे आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ या दाक्षिणात्या राज्यांनी वनक्षेत्र वाढविण्यात मोठे योगदान दिले असताना महाराष्ट्र मात्र पिछाडीवर गेल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १७ चौरस किलोमीटरची घट झाली आहे.  विशेष म्हणजे २०१६ या वर्षी २ कोटी व २०१७ मध्ये ४ कोटीहून अधिक वृक्षलागवड करुनही महाराष्ट्रातील वनक्षेत्रात घट झाली  आहे. विकासात्मक कामांसाठी झालेला वनजमिनीचा वापर, शेतीसाठी वनजमिनीवर झालेले अतिक्रमण व अन्य कारणांमुळे वनक्षेत्रात घट होण्याची पाळी महाराष्ट्रावर ओढवली आहे. राज्यात १४९ चौरस किलोमीटर वनक्षेत्राची घट दिसून येत असली, तरी वनक्षेत्राबाहेर वृक्षलागवडीमुळे वाढलेली वृक्षांची संख्या लक्षात घेता ही घट फार चिंतेची बाब नाही. पश्चिम घाटात वृक्षसंवर्धनासाठी केलेल्या मोठ्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राची बाजू सावरल्याचे अहवालात म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SCA1P
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना