गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.४: १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व प्रमुख मार्ग खड्डेमुक्त करणार, अशी घोषणा होऊन २० दिवस उलटले, तरी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील खड्डे जैसे थे आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने सरकारच्या घोषणेवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील रस्त्यांची हालत गंभीर असल्याबाबत विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. दौऱ्याहून परतल्यानंतर ३ डिसेंबर रोजी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व प्रमुख महामार्गांवरील खड्डे बुजविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी राज्याला १ लाख ६ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहितीही श्री.पाटील यांनी दिली होती. त्यांच्या घोषणेनंतर राज्यभरात खड्डे बुजविण्याचा उपक्रम सुरु झाला. गडचिरोली जिल्ह्यातही ही मोहीम हाती घेण्यात आली. परंतु अजूनही मुख्य मार्गावरील खड्डे जैसे थे आहेत. गडचिरोली-आरमोरी या वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. किटाळी व चुरमुरा गावांजवळच्या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. गडचिरोली-आरमोरी मार्गावरुन जाताना तीन नद्या ओलांडून जावे लागते. परंतु पुलाजवळच खड्डे असल्याने नागरिकांची पंचाईत होते. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. चातगाव-पेंढरी मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. हा भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या मार्गावरुन पोलिसांना नेहमी जावे लागते.या रस्त्यावरील काही खड्डे उशिरा बुजविण्यात आले. परंतु अजूनही अनेक खड्डे जैसे थे आहेत. आलापल्ली-भामरागड रस्त्याची अवस्था दयनीय आहे. आलापल्ली-सिरोंचा हा मार्गही खड्डेमुक्त होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, खड्डेमुक्त महाराष्ट्राची सरकारने केलेली घोषणा फोल ठरल्याची टीका होत आहे.