गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंबेडकरी संघटना व विविध राजकीय पक्षांच्या वतीने आज गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
बंदच्या अनुषंगाने काल(ता.२) विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत, ओबीसी कर्मचारी संघटनेचे प्रा.शेषराव येलेकर, संभाजी ब्रिगेडचे दादाजी भर्रे, नगरसेवक प्रा.रमेश चौधरी, बीआरएसपीचे डॉ.कैलास नगराळे, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, नगरसेवक सतीश विधाते, ओबीसी युवा संघटनेचे रुचित वांढरे उपस्थित होते. शाळा, महाविद्यालये व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून नागरिकांनी हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान भीमा कोरेगावच्या घटनेनंतर नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नये, तसेच अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.