मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीत १७ डिसेंबरच्या कुणबी महामेळाव्याची जय्यत तयारी

Saturday, 16th December 2017 04:14:56 AM

गडचिरोली, ता.१६: येथे रविवारी १७ डिसेंबर रोजी कुणबी महामेळावा आयोजित करण्यात आला असून, सर्व समाजबांधव मेळावा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी तयारीला लागले आहेत.

रविवारी दुपारी १२ वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महामेळावा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडणारे भाजपचे खासदार नाना पटोले हे या मेळाव्याचे आकर्षण असून, खा.पटोले यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय सुप्रसिद्ध कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या सडेतोड विचारांची मेजवानीही उपस्थितांना मिळणार आहे. आ.बच्चू कडू, आ.बाळू धानोरकर व विचारवंत प्रा.दिलीप चौधरी हेदेखील या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

मेळाव्याच्या तयारीसाठी सर्व कुणबी समाजबांधव एकत्र आले असून, गावागावात फिरुन त्यांनी जनजागृती केली आहे. मेळाव्यासाठी शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला असून, २० हजार लोक बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. आज दुपारी युवक, युवती, महिला व पुरुषांनी शहरातून मोठी रॅली काढून वातावरणात रंग भरले.

मेळाव्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. चामोर्शी व चंद्रपूरमार्गे येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था अभिनव लॉन येथे, आरमोरीमार्गे येणाऱ्यांसाठी तुळजाबाई प्राथमिक शाळेचे प्रांगण, तसेच धानोरामार्गे येणाऱ्यांसाठी बसस्थानकाबाजूच्या प्रांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मेळाव्याच्या आयोजन समितीचे सदस्य महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी 'गडचिरोली वार्ता'ला दिली.

सिनेट निवडणुकीतही दिसली कुणबी समाजाची ताकद...

१० डिसेंबरला गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा, विद्याशाखा व अभ्यासमंडळांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत  सेक्युलर महाआघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून आले. या विजयासाठी अनेक बाबी कारणभूत असल्या, तरी सिनेट निवडणूक आणि 'कुणबी मेळावा' यांचा घातलेला योग्य समेट, हेही विजयाचे एक कारण आहे. सिनेट निवडणुकीत भाजपप्रणित अभाविप व शिक्षणमंच पूर्ण तयारीने उतरले होते. परंतु या संघटनेने विशेषत: पदवीधर सिनेटमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांमध्ये एखाद अपवाद वगळता कुणबी समाजाला प्राधान्य दिले नाही. अभाविप व शिक्षणमंचने बहुतांश उमेदवार अल्पसंख्याक समाजातील दिले होते. हीच बाब कुणबी समाजातील धुरिणांना खटकली. त्यांनी सेक्युलर महाआघाडीत सहभागी होऊन खुल्या प्रवर्गात ९५ टक्के एकजात कुणबी उमेदवार दिले. सिनेट निवडणुकीत ताकद दाखवायची म्हणून अगदी कमी वेळात कुणबी मेळाव्याच्या सुपिक कल्पनेलाही मूर्तरुप देण्यात आले. या मेळाव्यासाठी जनजागृती करताना 'सिनेट आणि मेळावा' अशा दोन्ही बाबी व्यवस्थितरित्या हाताळण्यात आल्या. त्यामुळे एकजूट दाखवायचीच, या इराद्याने संपूर्ण कुणबी समाजबांधवांनी एकत्र येऊन सिनेट निवडणूक लढवली. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपबद्दल दलित, आदिवासी व अन्य प्रवर्गात असलेल्या असंतोषाचा फायदाही त्यांना आपसूकच मिळाला आणि सिनेटवर पूर्ण ताबा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे १७ तारखेचा महामेळावा भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ करेल की काय, याकडेही जाणकारांचे लक्ष लागले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7NKPF
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना