गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१४: येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज सकाळी लागल्यानंतर दिवसभर विद्यापीठात शुकशुकाट होता. महत्त्वाचे अधिकारी नसल्याने पत्रकारांना अधिकृत माहिती कुणीच दिली नाही. ही माहिती उद्या(ता.१५)मिळणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले. यावरुन या विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाची चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागली असून, तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गोंडवाना विद्यापीठाची पदवीधर अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळांची निवडणूक १० डिसेंबरला पार पडली. काल(ता.१३) सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. आज(ता.१४)सकाळी १० वाजताच्या सुमारास सर्व निकाल हाती आल्यानंतर मतमोजणी संपली. ही संपूर्ण प्रक्रिया आटोपल्यानंतर रात्रभर जागलेले विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी विद्यापीठात आलेच नाही. केवळ कुलगुरु, प्र-कुलगुरु, वित्त व लेखा अधिकारी आणि काही निवडक कर्मचाऱ्यांनीच विद्यापीठात हजेरी लावली. त्यामुळे मतमोजणीची अधिकृत माहिती घेण्यासाठी विद्यापीठात गेलेल्या पत्रकारांना माहिती न घेताच माघारी फिरावे लागले. कुलसचिवांनी पत्रकारांचे फोन स्वीकारले नाही. काहींचे मोबाईल स्वीच ऑफ होते.
निवडून आलेल्या उमेदवारांबाबत कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी 'आज विद्यापीठ बंद आहे', असे सांगून टाकले. निकालाची अधिकृत मंजुरी घेण्यात येईल आणि संबंधित माहिती उद्या १५ डिसेंबरला मिळेल, असेही ते म्हणाले. पत्रकारांनी मतमोजणीच्या वेळी उपस्थित राहून घोषणा ऐकावयास हवी होती, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. विशेष म्हणजे, विद्यापीठाने कोणत्याही पत्रकाराला मतमोजणीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले नव्हते. या संपूर्ण भोंगळ कारभाराबाबत पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पहिले कुलगुरु डॉ.विजय आईंचवार व कुलसचिव डॉ.विनाय इरपाते यांच्या विरोधातही पत्रकारांनी अनेक बातम्या लिहिल्या. मात्र, दोघेही व्यवस्थापनात कुशल होते. काही चुका झाल्यास ते हसत हसत मान्य करीत होते. परंतु सध्याच्या कुलगुरुंमध्ये हा मनाचा मोठेपणा दिसत नाही, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.