गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१८: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व विद्युतीकरण न झालेल्या २६७ गावांपैकी ८१ गावांमध्ये वीज पोहचविण्याचे काम महावितरणद्वारे नुकतेच करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी जिल्ह्यातील विद्युतीकरण न झालेल्या व वीजपुरवठा खंडित असलेल्या गावांच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०१६-१७ च्या सर्वसाधारण योजनेंतर्गत ५ कोटी रुपये व आदिवासी विकास योजनेंतर्गत ७ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महावितरणने गावांचे विद्युतीकरण केले आहे. मरकेगाव, पुरसलगोंदी, मांगदाटोला, यजूटोला, किसनेली, मोठाझेलिया, लहान वडगाव, सलईटोला, मारगिनटोला, हुराटोला, केहकावाही, धुरपुडाटोला, येरंडीटोला, भुसुमकुडी, दाब्बा, रानवाही, शिवगट्टा, एकराखटोला, कुद्री, कामके, रोपी, झुपी, पेनगुडा, घाटपाडी, कुचेर, वडसाकल, सिडामटोला, जांभूळगट्टा, तारामटोला, कनेली, कानाकोंडा(बु), कानाकोंडा(खु), कोंडाटोला, येंकाबंडाटोला, चारवाही, बंदूर, केहकावाही एस, गडाडपल्ली टोला, कुंडुमटोला, विकासपल्ली, कुसुमपल्ली, भिमनखोजी, दुसागुडा, मालनगट्टा, हजबोडी, रेखामेटा, मर्दकुही,पावरवेल, तिरणपार, हुरयालदंड, रमेशगुडम,कोलाटोला, वडगाव, मोटाटोला, इटामरका, करमे, कसनसूर, जवेली, झुरी, केसनील, जुहीटोला, हटांजूर रिट, येनगाव, हलकनार, मोरचूल, नारकसा, टेकामेटा, मोहुर्ली, कोहका, बैलमागड, पिपली बुर्गी, हेटलकसा, धोडेपल्ली, बोटलाचेरु टोला, करमेटोला, मेडपल्ली, नवेगावटोला, रायपूरटोला, इरपनपल्ली, कुरुमवाडा या गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, तेथे प्रकाश पोहचला आहे.
ही सर्व गावे अतिदुर्गम व चहुबाजूंनी जंगलाने वेढलेली आहेत. या गावांतील आदिवासी बांधव जंगलावर अधिक व फार कमी प्रमाणावर शेतीवर उपजीविकेसाठी निर्भर आहेत. या ८१ गावांमध्ये प्रकाश पोहचविल्यानंतर आता उर्वरित १४१ गावांमध्ये महावितरणच्या माध्यमातून विद्युतीकरणाची कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ४५ अतिदुर्गम व घनदाट जंगलातील गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण शक्य नसल्याने सौरउर्जेच्या माध्यमातून विद्युतीकरण प्रस्तावित आहे.
महावितरणचे नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांच्याद्वारे विद्युतीकरणाच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गडचिरोली व आलापल्ली विभागाचे अभियंते व कर्मचारी सामाजिक दायित्व निभावत विजेचे रोहित्र व तत्सम सामग्रीची व्यवस्था करीत गावकऱ्यांपर्यत वीज पोहचविण्याचे काम करीत आहेत.
पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत दारिद्रृयरेषेखालील सर्व ग्राहकांना विनामूल्या वीजजोडणीदेखील आवश्यक त्या फिटींगसह उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.