गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२३: एकीकडे शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांकडून लूट सुरु असताना आ.डॉ.देवराव होळी यांच्या प्रयत्नातून चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथे ग्रामीण जनतेला फक्त ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्याचे आरओ सयंत्र उभारण्यात आले आहे.
इंडिया एसएमई अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी व राईट वॉटर सोल्युशने सीएसआर निधीतून जामगिरी येथील ग्रामपंचायत कार्यालात हा प्रकल्प उभारला आहे. अशाप्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प आहे. आज आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते या सयंत्राचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राईट वॉटर सोल्युशनचे प्रोजेक्ट मॅनेजर विकास पाटील, अभिजित गौड, अभियंता चंदन पाल, निखिल नरड, जीडीओ राजू कांबळे, सरपंच रेखा कोवे, पंचायत समिती सदस्य भाऊराव जेर्लीगर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भैयाजी वाढई, आदर्श ग्राम कार्यकर्ता खुशाल वाढई, ग्रामसचिव सराटे, शरद कोवे, शांताराम कोवे, गीता कोवे, पांडुरंग वाढई उपस्थित होते.
या सयंत्रातून एटीएम कार्ड पद्धतीने नागरिकांना केवळ ५ रुपयांत २० लिटर आरओचे पाणी देण्यात येणार आहे. या सयंत्राची देखरेख व व्यवस्थापनाचे काम महिला बचत गटाकडे देण्यात आले आहे. जामगिरी व परिसरातील काही गावांतील नागरिकांना हातपंप व विहिरीतील फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत होते. त्यामुळे त्यांना विविध आजारांचाही सामना करावा लागत होता. आता त्यांना थेट आरओचे शुद्ध पाणी मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.