गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२८: कोरची येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल नखाते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी काल(ता.२७)नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्यान्वये आरोपींवर गुहा दाखल केला आहे.
कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील एका मुलीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे वृत्त देशोन्नतीमध्ये २४ एप्रिलला प्रकाशित झाले होते. त्यानंतर आपल्या मुलीची बदनामी झाल्याचा गैरसमज करुन मृत मुलीचे वडील, भाऊ व अन्य दहा-बारा जणांनी देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल नखाते यांच्यावर २६ एप्रिलच्या सकाळी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर नखाते यांनी कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, हल्लेखोरांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नखाते यांच्यावरही भादंवि ३२३ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यामुळे पत्रकारांमध्ये रोष व्यक्त केला जात होता. त्याअनुषंगाने काल गडचिरोली प्रेसक्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची भेट घेऊन पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर डॉ.देशमुख यांनी नव्यानेच झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये हल्लेखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. शिष्टमंडळात प्रेसक्लबचे अध्यक्ष सुरेश नगराळे, सचिव नंदकिशोर काथवटे, सहसचिव अनिल धामोडे, अरविंदकुमार खोब्रागडे, रुपराज वाकोडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
घटनेचा तपास कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधीक्षक अभिजित फस्के करीत आहेत.