गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता. १५ : महामहीम राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत नोकरीसंबंधी काढलेल्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. मात्र, आदिवासी व गैरआदिवासींमध्ये दरी निर्माण होणे योग्य नाही. सर्वांना न्याय मिळेल, असे बदल अधिसूचनेत केले जातील, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली़. आज (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजि प्रजासत्तादिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.
आर. आर. पाटील म्हणाले, काही निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासींमध्ये असंतोष पसरला आहे. तो दूर करण्यासाठी सर्वांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून, सर्वांना शक्ती मिळेल असे वातावरण निर्माण केले जाईल. आत्मकेंद्री होण्यापेक्षा सर्वांनी देशप्रेमी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. अलिकडच्या काळात गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून, अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. सुरक्षा यंत्रणा, प्रशासन आणि जनतेच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगून आर. आर. पाटील यांनी मानव विकास निर्देशांकात सुधारणा होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात अव्वल असून, शेतमाल साठवणुकीसाठी बांधलेल्या गोदामांमुळे साठवणुकीच्या क्षमतेत मागील ५० वर्षांत दुप्पट वाढ झाल्याचेही ते म्हणाले. ठिकठिकाणी नवीन दवाखाने होत असून, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली़. पूल, रस्ते, चांगल्या आश्रमशाळांची निर्मिती करण्याबाबत शासन ठोस पावले उचलत असल्याचेही ते म्हणाले.
चकमकीत मृत्यूमुखी पडलेले पोलिस खबरे, जवान आणि नक्षल्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची तरतूद जिल्हा नियोजन समितीत करण्यात आल्याची माहिती आर. आर. पाटील यांनी दिली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री. रणजितकुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, नगराध्यक्ष निर्मला मडके, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.