गडचिरोली, ता़१४
राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सीमा रस्ते संघटना किंवा अन्य तत्सम प्रकारच्या यंत्रणेमार्फत रस्ते व पूल निर्मितीची कामे तत्काळ हाती घ्यावीत, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी आज १४ आॅगस्ट रोजी लोकसभेत केली
खा़ अशोक नेते यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला़ त्यांनी सांगितले की, देशात आतंकवादाने ग्रस्त अनेक जिल्हे आहेत़ त्याचप्रमाणे नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्याही भरपूर आहे़ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांच्या कारवाया अधिक होत असतात़ त्यामुळे दुर्गम भागातील रस्ते व पुलांची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत़ ही कामे सीमा रस्ते संघटना किंवा अन्य तत्सम यंत्रणांच्या माध्यमातून करावीत, अशी मागणी खा़नेते यांनी केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली़ नितीन गडकरी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना त्यांनी अनेक सुंदर रस्ते व पूल तयार केले़ त्यामुळे जनता त्यांना गडकरी नव्हे, तर रोडकरी मंत्री म्हणत होती, असेही खा़नेते यांनी लोकसभेच्या सभागृहात सांगितले़
यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले़ नक्षलग्रस्त भागातील जिल्ह्यांत रस्ते व पूल निर्मितीसाठी विशेष पॅकेज देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली़ विशेष पॅकेजच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील रस्ते व पुलांची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील नागरिक तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडले जाऊन मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केल्याची माहिती खा़अशोक नेते यांनी दिली़