गडचिरोली, ता़१४
महामहीम राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत नोकरीसंबंधी काढलेली अधिसूचना रद्द करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे,या प्रमुख मागण्यांसह गैरआदिवासींच्या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज (ता. १४) गैरआदिवासी सुशिक्षित बेरोजगार व विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चादरम्यान संतप्त युवकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी केल्याने त्यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला़
महामहीम राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी नोकरीसंबंधी ‘पेसा’ कायद्याबाबत अधिसूचना काढून वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत पेसा गावांतर्गत १०० टक्के आदिवासी उमेदवारांचीच भरती करावी, असे नमूद केले आहे. या अधिसूचनेमुळे जिल्ह्याच्या नोकरभरतीतून गैरआदिवासी उमेदवार हद्दपार होणार आहेत. यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून नोकर भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनाच सामावून घ्यावे, ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यावरून पूर्ववत १९ टक्के करावे इत्यादी मागण्यांसाठी आज दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला़ तत्पूर्वी चौकात काही मंडळींची भाषणेही झाली़ ही भाषणे सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे आगमन झाले़ यावेळी एका कार्यकर्त्याने भाग्यश्री आत्राम आता आपणास मार्गदर्शन करतील, असे माईकवरून जाहीर केले़ मात्र, उपस्थित संतप्त युवकांनी ‘भाग्यश्री आत्राम चले जाव’ अशा घोषणा दिल्या़ यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले़ भाग्यश्री आत्राम यांचा आपणास पाठिंबा असल्याचे त्यांनी माईकवरून सांगितले़ मात्र, युवकांची घोषणाबाजी सुरूच होती़ यामुळे भाग्यश्री आत्राम यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला़
----------------------------
फोटो क्रमांक -१४ जीडीसी ५१
कॅप्शन - मोर्चापूर्वी सभास्थळी उपस्थित असलेल्या भाग्यश्री आत्राम व अन्य