गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता. १२ : धनगर वा अन्य कोणत्याही समाजाचा किंवा जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करु नये, या प्रमुख मागणीसाठी आज (ता. १२) मंगळवारी सुमारे २५ हजार आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासी नागरिक मतभेद विसरून एकत्र आल्याचे चित्र दिसले.
विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ. डॉ. नामदेव उसेंडी, आ. दीपक आत्राम, आ. आनंदराव गेडाम, विलास कोडापे, बिरसा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन मसराम, जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले़ धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाने आंदोलन सुरु केले आहे. या मागणीचा जोरदार विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांनी मोर्चा काढला. आजच्या मोर्चात जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध संघटना, कर्मचारी संघटना, पुरुष, महिला, युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी व सर्वसामान्य आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इंदिरा गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी बचाओ, बोगस भगाओ, पेसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, हम सब एक है अशी घोषणाबाजी करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी प्रा. वसंत पुरके, आ. डॉ. नामदेव उसेंडी, आ. दीपक आत्राम, विलास कोडापे,अॅड. मनिराम मडावी, प्रभू राजगडकर, शालिक मानकर, प्रा. माधव सरकुंडे, प्रा. दौलत धुर्वे, प्रा़सयाम आदींची भाषणे झाली़
विशेष म्हणजे, या मोर्चात सहभागी काही युवकांनी खा. अशोक नेते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.