शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पावसाळा आणि आजार

Thursday, 6th August 2015 06:26:51 AM

 

आता पावसाळा म्हटलं की पाणीच पाणी चहुकडे, असं चित्र असायला हवं. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आवणास दिसतंय.  शेतीवर जसा पावसाचा परिणाम होतो, तसाच तो जनजीवनावरदेखील होत असतो.  आजही ग्रामीण भागात पावसामुळे चिखल-दलदल आणि त्यातून होणारे साथरोग अधून- मधून समोर येत असतात.

            पावसाळयात परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या बाबींकडे प्रत्येक व्यक्तीने लक्ष पुरविणे आवश्यक असते.  साधारणपणे आपणास होणारे जे आजार आहेत, त्यापैकी ७० टक्के आजार हे जलजन्य असतात. अर्थात पाण्याच्या माध्यमातून होणारे आजार असतात.

पावसाळयात पाणी हे आवश्यक असले, तरी ते बाधक ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागते.  पाणी अशुध्द असेल तर त्यातून आजारांचा उदभव

आणि प्रसार होण्याची शक्यता असते.  केवळ पाणी गाळून पिल्यामुळे त्यातील अशुध्दता संपत नाही. ज्या ठिकाणी जलशुध्दीकरणाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी पाण्यात क्लोरीनचा वापर करुन त्यातील जीवजंतू संपविता येतात.  त्याहीपेक्षा खात्रीलायक असा मार्ग म्हणजे पाणी उकळून घेणे हा होय.  पाणी उकळल्याने त्यातील जीवजंतू पूर्णपणे नष्ट होतात. दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होणे शक्य असते. त्यामुळे जेथे जलशुध्दीकरण यंत्रणा नाही, तेथे पाणी उकळून पिणे आरोग्यासाठी आवश्यक ठरते. पाण्यातून अतिसाराप्रमाणे काविळचीदेखील लागण होऊ शकते. त्यामुळे याबाबतीत अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे ठरते. पिण्याच्या पाण्यातूनच आरोग्याच्या समस्या उदभवतात असे नाही, तर पावसाळयात परिसरात साठणाऱ्या पाण्यातूनदेखील याला सुरुवात होऊ शकते.  प्रवाही नसलेल्या अर्थात एका जागी साठून राहणाऱ्या पाण्यात डास अंडी घालतात आणि या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकन-गुणिया तसेच हत्तीरोग आदींची लागण व प्रसार होत असतो.  ग्रामीण भागात असणाऱ्या डबक्यांमुळे याचे प्रमाण अधिक असते व पावसाळयामध्ये या स्वरुपाचा धोका अधिक वाढलेलाअसतो.

 त्यामुळे  पाणी साठणार नाही याची काळजी घेणे, तसेच डासांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, मच्छर पळविणाऱ्या उदबत्त्यांचा वापर करणे  आदी उपायांनी आपण आजारापासून दूर राहू शकतो. आरोग्य ही महत्वाची बाब आहे आणि त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.

- प्रशांत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0U06N
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना